Saturday, September 21, 2024
HomeUncategorizedराज्यातील वनसंवर्धनामध्ये स्व. उत्तमराव पाटील यांचे महत्वाचे योगदान - डॉ. वाय. एलपी....

राज्यातील वनसंवर्धनामध्ये स्व. उत्तमराव पाटील यांचे महत्वाचे योगदान – डॉ. वाय. एलपी. राव…

वनराई फॉउंडेशनचा वनसंवर्धन पुरस्कार २०२३ डॉ. सुरेश चोपणे यांना प्रदान…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर महाराष्ट्रात ५० अभयारण्यांच्या निर्माण झाली असून उल्लेखनीय म्हणजे यात ५ व्याघ्र प्रकल्पांचा देखील समावेश आहे यामुळे राज्यात वनसंवर्धन मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या कार्यात स्व. उत्तमराव पाटील यांचे महत्वाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार प्रधान प्रमुख वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य डॉ. वाय. एलपी. राव यांनी काढले. वनराई फाऊंडेशन व महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार-२०२३ सोहळा गुरुवार दि. २३ मार्च रोजी पार पडला, यावेळी ते बोलत होते.

यासोबतच वनांच्या संरक्षणासाठी या क्षेत्रात भरीव कार्य करण्याऱ्या आणि विविध वन्यजीवांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारा स्व. उत्तमराव पाटील स्मृती वनसंवर्धन पुरस्कार-२०२३ भारतीय विज्ञान काँग्रेस सदस्य व केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय सदस्य मा. प्रा. सुरेश चोपणे यांना प्रदान करून गौरवण्यात आले.

श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे, अजय पाटील, डॉ. पिनाक दंदे, निलेश खांडेकर, माधव मानमोडे , बी. बी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या संबोधनात डॉ. वाय. एलपी. राव यांनी भारतीय वनखात्यातील आपल्या सेवेचा संक्षिप्त आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी सत्कारमूर्ती डॉ. सुरेश चोपणे यांचा उल्लेख करीत कौतुक केले. त्यांनी स्व. उत्तमराव पाटील यांच्या वनसंवर्धन क्षेत्रातील कार्याला उजाळा दिला. आजघडीला निसर्ग संरक्षण आणि प्राणी गणना आदी कार्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे यांचा वापर करीत असल्यामुळे वनखात्याचे सशक्तीकरण झालेले आहे आणि ही प्रक्रिया आजही सुरूच आहे. तसेच महाराष्ट्राच्या वनखात्यात पुरुष आणि महिला उमेदवारांना समान संधी असून याबाबतीत राज्याचे वनखाते देशात अग्रेसर आहे अशी स्पष्टोक्ती देखील त्यांनी याप्रसंगी दिली.

आजचा कार्यक्रम हा आमच्यासाठी भावनिक सोहळा असल्याचे वनराई फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीला सांगितले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांच्या विषयी आस्था बाळगणारे स्व. उत्तमराव पाटील यांचे सारखे अधिकारी भविष्यात राहतील की नाही याबद्दल शंका आहे. अतिशय विपरीत परिस्थितीत वनखात्यातील वनरक्षक आपले कर्तव्य बजावीत असतात.

मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडेच असते. या सर्व गोष्टींना आधारभूत मानून अजय पाटील यांनी आपल्या दिवंगत वडिल उत्तमराव पाटील यांचे कार्य पुढे सुरु ठेवले आहे. डॉ. सुरेश चोपणे यांचेही त्यांनी अभिनंदन केले. केंद्रातील शासकीय समितीत सदस्य असताना देखील वनसंवर्धन आणि तत्सम कामाविषयी त्यांची प्रतिबद्धता कायम राहिली.

सत्कारमूर्ती डॉ. सुरेश चोपणे यांनी आपल्या सत्काराच्या उत्तरार्थ संबोधन करताना पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. उत्तमराव पाटील यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मला मिळाला हा माझा बहुमान समजतो. त्यांनी आपल्या पत्रकारितेतील कार्याला देखील उजाळा दिला.

वनसंवर्धनासाठी काम करण्याची खरी संधी चंद्रपूर येथे मिळाली आणि ग्रीन प्लॅनेट सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूर परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. इतर स्थानिक संस्थांना देखील सहकार्याला घेऊन आम्ही शासनाला बफर झोन घोषित करण्यास भाग पाडले. सन २०१४ साली भाजपा सरकार आल्यावर शासकीय समितीत नियुक्ती झाली आणि स्थानिक पातळीवरील काम शासकीय पातळीवर कसे उत्तम पद्धतीने करता येईल याकडे लक्ष केंद्रित केले.

हे कार्य करीत असताना मला सत्तापक्षातील राज्यातील तसेच केंद्रीय पातळीवरील नेत्यांचा विरोध देखील पत्करावा लागला. समृद्धी महामार्गाचे देखील आम्ही पूर्वनिरीक्षण केले होते. दरम्यान आम्ही सुचविलेल्या अंडरपासपैकी काहीच मंजूर करण्यात आले. विविध महत्वाच्या प्रकल्पांमध्ये, विकासकामांमध्ये आडकाठी आणल्याचा ठपका देखील शासकीय विभागाकडून ठेवला गेला.

लोकसत्ताचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी पर्यावरण आणि वन संवर्धन याविषयी आपली भूमिका ठेवताना या कार्यात येणारे विविध अडथळे आणि अन्य विषयांसंदर्भात वास्तव परिस्थितीवर भाष्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय पाटील यांनी केले. त्यांनी वनराईची पर्यावरण रक्षणसंबंधी भूमिका आणि कार्य विषद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन जतकर यांनी तर वनराईचे सचिव निलेशभाऊ खाटेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सिद्धार्थ मेश्राम, श्री. अरुण पॅडोरकर, श्री. नितीन गडपायले, श्री. डी. पी. चव्हाण, श्री. संजय माघाडे, श्री. ललित उचीबगलश्रे, श्री. संपत खोब्रागडे, श्री. आय. एम. सय्यद, श्री. ए.डी. मेश्राम, कु. अर्चना बडोले श्री. बी. बी. पाटील, श्री. एस.व्ही. भोवते, श्री. आर. पी. बलैया, श्री. अशोक व्ही. तुंगीडवार, श्री. एस. आर. शिंपाळे, श्री. एस. एस. राठोड, सतीश गडलिंगे, कैलास सानप, आनंद तिडके, उमेश बनगर,

दिगंबर गुंडेवार, सुनील भोयर, ललिता वरघट, रेखा राठोड, राणी महल्ले, शीला भिवगडे, सीमा दांडेकर, श्री. एम.डी. काळे, श्री. जी.डी. शिंदे, श्री. टी. एच. हरिणखेडे, श्री. के. डी. कावळे, श्री. के. पी. गिते, श्री. एस. एन. केंद्रे, श्री. एम. बी. रंगारी, कुमारी सुनीता लटपटे, श्री सचिन कापकर, श्री विकास चौधरी, श्री उमेश शिरपूरकर, श्री उत्तम आहेर, श्री शंकर शिंदे, श्री वसंता खडसे यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: