Wednesday, October 16, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | मंगरूळ कांबे येथील काटेपुर्णा प्रकल्प कोणी आणला?…आयत्या पिठावर रेघोट्या कोण...

मूर्तिजापूर | मंगरूळ कांबे येथील काटेपुर्णा प्रकल्प कोणी आणला?…आयत्या पिठावर रेघोट्या कोण ओढतेय?…

मूर्तिजापूर तालुक्यातील खारपारपट्ट्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी तत्कालीन आमदार तुकाराम बिडकर यांनी 2007-2008 मध्ये तालुक्यात तीन ठिकाणी सिंचनाचे प्रकल्प आणले. सदर प्रकल्प हे एकाच तालुक्यात असून या प्रकल्पासाठी भरघोस निधीही तेव्हा आणला होता. 2009 च्या दरम्यान विधानसभा निवडणुका लागण्याअगोदरच या तिन्ही प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर हा मतदार संघ अनुसूचित साठी राखीव झाला आणि या मतदार संघाचा विकासच खुंटला. या मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले. मात्र ते एवढे प्रभावी काम करू शकले नाहीत.

गेल्या पंधरा वर्षापासून या तिन्ही प्रकल्पाचे काम आजपर्यंत सुरूच आहे. त्यातील दोन प्रकल्प एक घुंगशी बॅरेज आणि दुसरा आता जो संपुष्टात आला तो मंगरूळ कांबे येथील काटेपुर्णा प्रकल्प. तर या प्रकल्पासाठी भरघोस निधी आणण्याचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेतले मात्र हा प्रकल्प तुकाराम भाऊच्या कार्यकाळात आणल्याने ही तिन्ही प्रकल्प विदर्भाच्या विशेष अनुशेष मध्ये असल्याने या प्रकल्पासाठी सरकार कोणतेही असो त्याला भरघोस निधी देणे बंधनकारक असेल अशी सोय तुकाराम बिडकर यांनी केली होती. मात्र या प्रकल्पाला वाढीव निधी महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मिळाल्याने विद्यमान आमदार यांची मोठी गोची झाली आहे.

विदर्भातील खारपाणपट्ट्यातील अकोला जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य शासनाने २००७ मध्ये हा प्रकल्प प्रस्तावित केला होता. विदर्भातील त्यातही विशेषतः पश्चिम विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांनी निर्देश दिले होते. काटेपूर्णा बॅरेजच्या प्रकल्पाचा प्रस्ताव ३१ ऑगस्ट २००७ रोजी सादर करण्यात आला होता. प्रकल्प प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवताना ७० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. परंतु, राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. बांधकाम साहित्याच्या दरात झालेली वाढ, भूसंपादनाकरिता झालेला विलंब या सारख्या कारणांमुळे प्रकल्पावर आता ५३३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित करण्यात आला. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुमारे 533 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मान्य केला होता त्यावेळी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी खास प्रयत्न केले होते. यासाठी बच्चू कडू यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजीही केली होती.

पंधरा वर्षांपूर्वी ७० कोटींमध्ये मंजूर झालेल्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आता 533 कोटींचा खर्च झाला आहे. काटेपूर्णा बॅरेजचे पाणी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीतून होणार आहे. या प्रकल्पामुळे मूर्तिजापूर शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न या प्रकल्पाने सुटणार असल्याने हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शहरवासी मोठी आतुरतेने वाट बघत होते.

तुकाराम बिडकर यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ द्वारे काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प सह दोन्ही बॅरेज प्रकल्पाचे जनक तुकाराम बिडकर हे असून त्यांनी 2009 मध्ये जिल्ह्यातील सर्वच पक्षांच्या नेत्यांना बोलावून या प्रकल्पाचा नारळ फोडला होता. गेल्या पंधरा वर्षात हा प्रकल्प आता कुठे पूर्ण झाला. मात्र निवडणुकीत याचा भाजपला फायदा मिळावा यासाठी घाईघाईने याचा लोकार्पण सोहळा साजरा करण्याचे ठरविले असून ज्याने हा प्रकल्प आणला त्यालाच भाजप विसरले असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे तुकाराम बिडकर हे सुद्धा महायुतीचा भाग असल्याने त्यांचे नाव या पत्रिकेमध्ये अपेक्षित होते. मात्र ज्याने प्रकल्प आणला त्यांचेच नाव विसरल्याचं दिसत आहे तर या जाहिरातीवर एकदम चिल्लर लोकांचे नाव आहेत, मात्र तुकाराम बिडकर चे नाव नसल्याने बिडकर यांचे समर्थक नाराज झाल्याचे दिसत आहे. तर भाजप हा युती धर्म पाळत नसल्याचे दिसत आहे. येत्या निवडणुकीत भाजपला माली समाजाची ताकद दाखवून देवू असे काही संतप्त कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हा महायुतीतील अजित पवार गटाच्या मोठ्या नेत्याचा अपमान असल्याने अनेकांनी बोलून दाखविले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: